योग आणि आयुर्वेद यामध्ये अंतःकरण आणि शरीर हे पांच महाभूतानी आणि त्रिगुणांनी बनलेले असते असे मानले आहे. त्या दृष्टीने त्यांच्यात अद्वैत आहे, स्थूल शरीराचा सर्वात सूक्ष्म भाग म्हणजे अंतःकरण होय. त्याचमुळे मनातील विकारांचे, भावनांचे शरीरावर परिणाम होत असतात आणि ते जाणता येतात हे आयुर्वेदात सांगितले आहे.
मल,मुत्र विसर्जन, भूक, तहान यांची जाणीव शरीरात काही संवेदना निर्माण होतात त्यामुळे होते.आयुर्वेदात यांना अधारणीय वेग म्हटले आहे. म्हणजे लघवीला होते आहे याची जाणीव झाली की लगेच मुतारी शोधावी, कंटाळा,टाळाटाळ करू नये.या वेगाचे धारण केले म्हणजे लगेच कृती केली नाही तर आरोग्य बिघडते.मल, मुत्र, अपानवायू, शिंका, तहान, भूक, निद्रा, खोकला.
श्रम केल्याने लागलेला दम, जांभई, अश्रू, उलटी आणि शुक्र असे तेरा वेग धारण करू नयेत.
मनात राग, भीती, वासना,शोक अशा भावना येतात त्या वेळीही शरीरात बदल होतात. त्यामुळेच यांनाही आयुर्वेदात वेग असे म्हटले आहे.मात्र हे वेग धारणीय आहेत.त्यांचे धारण करायचे म्हणजे त्या नुसार लगेच कृती करायची नाही.
भीती वाटते आहे हे लक्षात आले की शरीरावर लक्ष न्यायचे. भीतीचा परिणाम म्हणून छातीत धडधड होत असते,श्वासगती वाढलेली असते, बोटांना कंप असू शकतो. शरीरातील हे बदल जाणायचे, त्यांच्यापासून पळून जायचे नाही, जे काही होत आहे त्याला धैर्याने सामोरे जायचे. आणि जे काही जाणवते आहे ते वाईट आहे,ते नको अशी प्रतिक्रिया न करता त्याचा स्वीकार करायचा. शरीर आणि मनात जे काही होते आहे ते साक्षीभाव ठेवून जाणायचे, हेच साक्षी ध्यान होय.आयुर्वेदातील सत्त्वावजय चिकित्सेत असे ध्यान शिकवले जाते आणि त्याचा एक, दोन मिनिटे अनुभव घेतला तरी भीती, राग, शोक यांची तीव्रता कमी होते.यामुळे ही चिकित्सा चिंतारोग, फोबिया, आघातोत्तर तणाव अशा मानसिक त्रासात तसेच तणावाचा परिणाम म्हणून होणाऱ्या मायग्रेन, सोरीअसीस,आतड्यातील जखमा अशा अनेक शारीरिक आजारात देखील उपयुक्त होऊ शकते.
No Comments
No comments yet.
RSS feed for comments on this post. TrackBack URI
Leave a comment